Sunday, April 18, 2010

पहिली चोरी !!!


गेल्या ५-६ महिन्यांत मराठी ब्लॉग्सच्या जगात मुक्त मुशाफिरी करताना एक लक्षात आलं की इथे एकापेक्षा एक सशक्त लेखन करणारी मंडळी आहेत. नुसतं वाचक म्हणून इथे वावरलो तरीही आपल्या साहित्यविषयक किंवा एकूणच जीवनविषयक ज्ञानात, अनुभवात खूप भर पडेल, पडते आहे. पण दुर्दैवाने लवकरच हेही लक्षात आलं की इथे असे एकसेएक भन्नाट लिहिणारे जेवढे आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त लोक ते लेखन सरळ, जसंच्या तसं, मूळ लेखाचा आणि मूळ लेखकाचा साधा उल्लेखही न करता, त्यांना योग्य ते श्रेय न देता बिनदिक्कतपणे आपल्या ब्लॉगवर टाकणारे, कॉपी+पेस्ट करून इमेल मध्ये चिकटवून फॉरवर्ड करणारे आहेत. अनेक महिने वेगवेगळया अनेक ब्लॉग्सचं वाचन केल्याने (जवळपास) प्रत्येक ब्लॉगरची भिन्न, युनिक शैली, विषय, मांडणी, रचना आणि एकूणच लेखन यामुळे ते लेखन त्या त्या ब्लॉगवर न वाचता (दुर्दैवाने आणि चुकूनमाकून) इतर कुठे वाचायची वेळ आली तरी मूळ लेखक सहज ओळखता येऊ लागला. सुरुवातीला काय करावं ते न कळल्याने 'हे असं चालायचंच' असं वाटून त्या गोष्टीकडे थोडंफार दुर्लक्ष केलं गेलं. पण बघता बघता या गोष्टी वारंवार होतायत असं लक्षात यायला लागलं किंवा अशा बाबतीत नजर थोडी जास्तच शोधक बनल्याने अशा चोर्‍या (यापेक्षा सौम्य शब्द मला तरी माहित नाही) जास्तच चटकन दृष्टीस पडू लागल्या. आणि एक दिवस चक्क माझ्याही कवितेची दुसर्‍या एका अशी चोरी झाल्याचं लक्षात आलं. तेव्हा मग त्या ब्लॉगच्या त्या पोस्ट वर जाऊन मी आणि आपल्या ब्लॉगु-ब्लगिनींनी अनेक प्रतिक्रिया देऊन मूळ कवितेची लिंक दिली. कालांतराने त्या ब्लॉगमालकाने माफीही मागितली. पण एक लक्षात आलं की हा प्रकार आपल्या नजरेस पडला म्हणून आपण तिथे जाऊन प्रतिक्रिया देऊन आणि आपल्या मित्रांना प्रतिक्रिया द्यायला सांगून त्या ब्लॉगमालकाला त्याची चूक मान्य करायला भाग पडू शकलो. पण असे असंख्य गुणी लेखक/लेखिका असतील की ज्यांच्या लेखनाच्या रोज चोर्‍या होत असतील आणि त्या बिचार्‍यांना आपलं लिखाण दुसरा कोणीतरी परस्पर आपल्या नावावर खपवून उगाच आपलं श्रेय लाटतोय याची कल्पनाही नसेल. तेव्हापासून मी जेव्हा जेव्हा अशा चोर्‍या नजरेस पडल्या तेव्हा तेव्हा त्या लेखाखाली जाऊन मूळ लेखाची लिंक द्यायला लागलो. तर बयाच वेळा अशा प्रतिक्रिया दिल्यावर ते ब्लॉगमालक ती पोस्ट अपडेट करून लगेच मूळ लेखकाचं नाव आणि मूळ लेखाची लिंक द्यायला लागले. पण सगळ्यांचं कारण जवळपास एकच असे की "मला हा लेख/कविता इमेल मधून आली होती आणि तिथे मूळ लेखकाचं नाव नव्हतं." खरंतर मूळ लेख शोधणं आजच्या गुगल जमान्यात अजिबात अवघड नाही हे वेगळं सांगायला नको. असो. पण सगळेच जण असे लगेच माफी मागणारे नव्हते. याच्या उलट अनुभवही आले. चोराच्या ब्लॉगवर जाऊन तिथे त्याला मूळ लेखनाबद्दल माहिती करून देणारी प्रतिक्रिया दिली की ती प्रतिक्रिया कधी प्रकाशितच केली जायची नाही. उलट इमेल मधून धमक्या यायच्या की "या ब्लॉगवरील लेखन माझे आहे असं मी कुठेच म्हटलेलं नाही. हा ब्लॉग म्हणजे माझ्या आवडत्या लेखांचा, कवितांचा संग्रह आहे. प्रतिक्रिया देण्यापूर्वी विचार करत जा."  असा उद्धटपणाआड लपलेला साळसूदपणाचा आव आणला जायचा. किंवा कधी कधी तर त्या लेखावर "वा वा ", "सुंदर..", "फारच छान.. खूप आवडलं." अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया प्रकाशित केल्या जायच्या पण मूळ लेखनाचा दुवा दिलेली प्रतिक्रिया मात्र हटकून प्रसिद्ध केली जायची नाही. हे असं झालं की संताप व्हायचा. तेव्हा मग मी अजून एक प्रकार करणं सुरु केलं. मूळ लेखकाच्या ब्लॉगच्या त्या लेखावर जाऊन त्याच्या खाली "आपला हा लेख अमुक अमुक ब्लॉगवर चोरीला गेला आहे"' असं लिहून चोरट्या ब्लॉगची लिंक द्यायचो. ही मात्रा मात्र बरेचदा काम करायची. मूळ लेखकाने चोरट्याला मेल/प्रतिक्रिया देऊन खडसावाल्यावर बरेच (सगळे नव्हे. तरीही शिरजोरी करणारेही अनेक बघितले) चोर सरळ व्हायचे आणि मग त्यांच्या ब्लॉगवरून तो लेख काढून टाकायचे. यातला एकही प्रसंग उगाच सनसनाटी निर्माण करण्यासाठी दिलेला नाही. प्रत्येक चोरीचे/मेलचे/प्रतिक्रियांचे पुरावे माझ्याकडे आहेत. पण मुद्दामच मी आत्ता इथे एकाही ब्लॉगचं, लिंकचं, लेखकाचं नाव देत नाहीये. कारण जवळपास बरीच प्रकरणं मिटलेली आहेत. तर हे असं पुन्हा पुन्हा झालेलं बघितल्यावर मात्र काहीतरी करायला हवं हा विचार डोक्यात घुमायला लागला. "आपण साधे मराठी ब्लॉगर. आपण काय करणार?" असा विचार मनात येतो ना येतो तोच त्याचं उत्तर मिळालं. आपण ब्लॉगर .. आपण काय करणार?? सोप्प आहे. आपण नवीन ब्लॉग सुरु करणार. हो हो.. नवीन पोस्ट नाही.. नवीन कोरा करकरीत ब्लॉग. कशासाठी?? तर या अशा चोर्‍या सगळ्यांसमोर याव्यात यासाठी. अशा चोर्‍या सगळ्यांसमोर आल्या की आपोआपच त्या कमी होतील. अर्थात पूर्ण नाहीशा होतील असं नाहीच. प्रमाण तरी कमी होईल. तेवढाच आपला खारीचा वाटा.
थोडक्यात काय तर जेव्हा जेव्हा आपल्याला अशी चोरी दिसेल तेव्हा आधी नेहमीप्रमाणे मूळ लेखावर जाऊन चोरीच्या लेखाची आणि चोरीच्या लेखावर जाऊन मूळ लेखाची लिंक द्यायची. १-२ दिवस वाट बघूनही चोरीच्या ब्लॉगमालकाचं काही उत्तर आलं नाही तर ती चोरी सरळ या आपल्या नवीन ब्लॉगवर टाकायची. म्हणजे जास्तीतजास्त लोक ते वाचतील. चोरी जगजाहीर होईल आणि आपोआपच चोराला नमतं घ्यावं लागेल. यात फायदा आपल्या सगळ्यांचाच आहे. आपले अनेक लेख/कविता चोरीला जात/गेले असतील पण आता अशा चोर्‍यांवर लक्ष ठेवणारे आपण एकटेच नसू. सगळेजण मिळून हे काम करतील आणि चोरी पकडून देतील. आणि आपल्या या  संघटीत कामामुळे असे चोर आपोआपच दबकून राहतील आणि त्यामुळे कदाचित आपल्या लेखांच्या भविष्यात होऊ शकणार्‍या चोर्‍या रोखल्या जातील. अर्थात या प्रश्नाचा आवाका खूप मोठा आहे. त्याच्यावर ठोस उपाय सध्यातरी कोणालाच माहित नाही (कोपीराईट वगैरे सगळं ठीक आहे. पण त्याच्याने हे प्रकार रोखले जातायत का या प्रश्नाचं उत्तर हो असतं तर हा ब्लॉग सुरु करायची वेळच आलिओ नसती.). पण त्यामुळे स्वस्थ बसण्यापेखा आपण स्वतः काहीतरी केल्याचं आणि हे प्रकार थोडे तरी कमी केल्याचं समाधान. आणि त्यासाठीच हा नवीन ब्लॉग सुरु करतोय. पण आधी म्हटल्याप्रमाणे हा ब्लॉग माझा एकट्याचा नाही. आपल्या सगळ्यांचा आहे. 
आणि हो.. या ब्लॉगवर रोजच्या रोज, नियमित पोस्ट्स टाकाव्या लागल्या नाही, तशी वेळ आली नाही तर आनंदच आहे.. नाही का? :-)
तर आजच्या चोरीचे तपशील पुढीलप्रमाणे..


आणि भाग तिसरा येतोय. म्हणजे मूळ लेखकाने बिचार्‍याने एका पोस्ट मध्ये लिहिलेल्या लेखाची ही अनेक भागांमध्ये चोरी. छान चाललंय !!!!
मी भाग-१ वर मूळ लेखाची लिंक दिली होती. पण आज बघतो तर भाग-२ सुद्धा आला. म्हणून मी भाग-१ वर जाऊन माझ्या प्रतिक्रियेला काय उत्तर दिलं आहे  हे बघायला गेलो तर तिथे माझी प्रतिक्रिया सोडून इतर सगळ्या "वा वा छान छान" वाल्या प्रतिक्रिया प्रकाशित झालेल्या आहेत. मग लक्षात आलं की "अरे चोरा, मूळ लेखक अज्ञात नसून तो तुला मुद्दाम अज्ञात ठेवायचा आहे.". पण त्याच्या दुर्दैवाने अति झालेल्या या चोरी प्रकरणांमुळे या ब्लॉगची कल्पना सुचली आणि पाहिलं अपीलही झालं. आता विकेट कधी पडते ते बघुया. मग? बघता काय? चोरीच्या लेखांवर जाऊन पाडा प्रतिक्रियांचा पाउस.

आणि आधी म्हटल्याप्रमाणे या ब्लॉगवर रोजच्या रोज, नियमित पोस्ट्स टाकाव्या लागू नयेत हीच सर्व चोरांना आणि देवाला प्रार्थना !! :-)